बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी राज्य बॅंकेने प्रशिक्षण केंद्र सुरु करावे

– मंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई,

 

सहकार क्षेत्रात सातत्याने वेगवेगळे बदल होत आहेत. याशिवाय, केंद्र सरकार नवीन सहकार धोरण तयार करत आहे. सहकारातील या बदलांची माहिती आणि अभ्यास हा विविध कार्यकारी सहकारी संस्थांमधील सचिव ते बँकेच्या व्यवस्थापकांपर्यंत सर्वांचा हवा. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने स्वतःचे प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू करावे, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘बँकिंग दिनदर्शिका २०२४’ चे प्रकाशन सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, माजी मंत्री आनंदराव अडसूळ, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, अनंत भुईभार, तेजल कोरडे, लीलाताई अनास्कर आदी यावेळी उपस्थिती होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, बँक आणि येथील व्यवस्थापनाने आर्थिक शिस्त वाढवली. अडचणीतून बाहेर काढून आज चांगल्या स्थितीला आपण आलो. अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविल्या. बँकेचे सगळ्यात महत्वाचे काम हे कृषी क्षेत्राला अर्थसाह्य करण्याचे आहे. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहते. सध्या राज्यातील सगळ्या भूविकास बँका बंद पडल्या आहेत, तर 5-6 जिल्हा बँका तग धरून आहेत. इतर जिल्हा बॅंकांची स्थिती ही आजारी पडल्यासारखी आहे. अशा बॅंकांना मदत केल्याशिवाय त्या उभ्या राहणार नाहीत. राज्य बँकेने जिल्हा बँकेला मदत केली नाही तर त्या बँका विविध कार्यकारी सहकारी संस्थेला मदत करू शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मदत मिळत नाही. गावपातळीवर शेतकऱ्यांना बॅंकेने मदत केली पाहिजे, असे ते म्हणाले.

सध्या केंद्र सरकारचे नवीन सहकार धोरण तयार होत आहे. प्राथमिक सहकारी सेवा संस्थांची बळकटीकरणावर यामध्ये भर देण्यात आला आहे. सर्व सहकारी संस्था एकमेकांना जोडण्याची (लिंक करण्याची) तरतूद यामध्ये आहे. अशावेळी विकास संस्था, पतसंस्था, नागरी सहकारी बॅंका येथील अधिकारी –कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मंत्री श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

राज्य सहकारी बॅंकेने राबविलेली आत्मनिर्भर कर्ज योजना अतिशय चांगली आहे. कोविड नंतर आपण आत्मनिर्भर कर्ज योजनेतून अनेक कारखाने आणि संस्थांना मदत केली. त्यामुळे या संस्था काहीशा सुस्थितीत येऊ शकल्या. विविध प्राथमिक सहकारी संस्थांना बळकटी आणण्यासाठी आता प्रयत्न होत आहेत. त्यासाठी काय योजना आणता येतील, त्यादृष्टीनेही राज्य सहकारी बॅंकेने पावले उचलावीत, असे मंत्री श्री. वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले. सहकारविषयक धोरणात सातत्य असणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

बॅंकेचे प्रशासक श्री. अनास्कर यांनी यावेळी बॅंकेने गेल्या काही वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. देशातील राज्य सहकारी बॅंकामध्ये सर्वात जास्त स्व-निधी, सर्वात जास्त 45 हजार कोटी रुपयांचे व्यवहार, 609 कोटी रुपये निव्वळ नफा, सुरक्षा व्यवस्थापनात आयएसओ मानांकन मिळविणारी ही एकमेव बॅंक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

बॅंकिंग दिनदर्शिका -2024 मध्ये आर्थिक शिस्त आणि व्यवहारांविषयीची माहिती देण्यात आल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button