ठाकरे आणि आम्ही जीवा-भावाप्रमाणे लढलो, आमचा स्ट्राईक रेट जास्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
देशाचा निकाल हा परिवर्तनाला पोषक असून पुढची दिशा ही इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.
![](https://marathi.aaryaanews.com/wp-content/uploads/2024/06/uddhav-sharad-pawar-janak-bhat.jpg)
मुंबई: देशाचा निकाल हा परिवर्तनाला पोषक असून पुढची दिशा ही इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की,लोकसभा निवडणुकीचा हा निकाल झाल्यानंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. विशेषत: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि इतर प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. कदाचित दिल्लीत उद्या संध्याकाळी आमची बैठक पार पडेल. या बैठकीत आम्ही सामंजस्याने निर्णय घेऊ. आज अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात १० पैकी ७ जागांवर आघाडीवर आहोत. हे यश फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे, असं मी मानत नाही. काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आमचे सर्व सहकाऱ्यांनी मेहनत केली त्यामुळे हे यश सगळ्यांना मिळालं. महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेचे खबरदारी घेऊ. असेही शरद पवार साहेब म्हणाले.
पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, आता त्यांना मिळालेल्या जागा त्यांना मर्यादित मार्जिनच्या आहेत. आम्ही राष्ट्रीय पातळीवर काम करतो. आमच्या सहकाऱ्यांनी सर्वाधिक लक्ष दिलं. त्यामुळे उत्तरेतील चेहरा बदलण्याचं काम करू. आम्ही काळजी घेऊ. निकाल लागल्यावर काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. खर्गे, सीताराम येच्युरी आणि इतरांशी चर्चा केली. अजून नक्की नाही. उद्या दिल्लीत बैठकीत होणार असल्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत आम्हाला निरोप मिळेल. उद्याच्या बैठकीला तातडीने जाऊ. पुढची नीती सामूहिकपणे घेऊ असे शरद पवार साहेब यांनी बोलताना सांगितले आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की, बारामतीमधून माझ्या राजकारणाची सुरूवात झाली, त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये आम्हाला चांगलं लीड मिळालं, राज्यात ठाकरे-काँग्रेस आणि आम्ही जीवाभावाप्रमाणे लढलो. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं चित्र आहे. असेही शरद पवार साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
यावर सविस्तर बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, लोकसभा निवडणूकांचे सर्व निकाल अद्याप हाती आले नसले तरी महाराष्ट्राने परिवर्तनाच्या दिशेने निकाल घेतल्याचे स्पष्ट होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उ. बा. ठा.) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ह्या महाराष्ट्र विकास आघाडीतील घटकांनी सामूहिकरित्या जनतेपुढे आपली भुमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेणे, लोकशाही मुल्यांचे रक्षण करणे ही ती प्रमुख भुमिका होती. जाती-धर्माच्या वादा पलीकडे जाऊन रोजगार, महागाई यांसारख्या दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आघाडी कटीबद्ध होती. ह्या भुमिकेचे जनतेने स्वागत केले, सन्मान राखला आणि म.वि.आ. वर विश्वास दाखवला याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. असे शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की, राहूल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र विकास आघाडी आपली भुमिका तळागळातील जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटच्या घटकाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आम्ही सतत सामूहिक प्रयत्न करू असा शब्द आपणास देतो. असे शरद पवार साहेब यांनी सांगितले आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की, ह्या निवडणूक निकालाने देशातील चित्र देखील बदलले आहे. ह्यात महाराष्ट्राची प्रमुख भुमिका आहे. याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा मला अभिमान आहे. देश हिताच्या दृष्टीने इंडिया आघाडी काही पावले टाकत असतील तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामूहिक योगदान देण्यात अग्रभागी राहू असे पवार साहेब म्हणाले.
अतिशय संघर्षपुर्ण झालेल्या ह्या लोकशाही लढ्यात महाराष्ट्रातील जनतेने कणखर साथ दिली त्याबद्दल जनतेचे मी पुन्हा ऋण व्यक्त करतो. तसेच महाविकास आघाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी हे यश मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन करतो असेही शरद पवार साहेब म्हणाले.
लोकसभा निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस भवना समोर फटाके फोडत ढोल ताशाच्या गजरात आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणुकीमध्ये घवघवीत यशा मिळाले आहे. याचा आनंद साजरा करत पक्ष कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांकडून शरद पवार साहेब यांचा फोटो घेत नाचत जल्लोष साजरा केला आहे तसेच एकमेकांना पेढे भरवत विजय साजरा केला आहे.