महाराष्ट्रमुंबई

Mumbai: विधानसभा निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुल्कांसारखे वादग्रस्त अधिकारी हटवा.

काँग्रेस शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी.

गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला: नाना पटोले

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची अद्याप मदत नाही, अवकाळी पावसासारखेच अवकाळी सरकार.

मुंबई: विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची कारकिर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. निवडणुका पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
महाराष्ट्र दौ-यावर असलेल्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम आणि डॉ. गजानन देसाई यांचा समावेश होता. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २४ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्राची प्रत आज पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केली व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली.


यासंदर्भात टिळक भवन मध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही भाजपा युती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्या भाजपा युती सरकारला अनुकुल अशी भूमिका घेऊन मदत करत असतात, असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत, अन्यथा निवडणूक निष्पक्ष होणार नाही. अशी मागणी काँग्रेसने केली असून निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्रालयातील गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली व गृहमंत्र्यांच्या नावाच्या पाटीची तोडफोडही केली. राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.
भाजपा युती सरकारने विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे, विकास कुठेच दिसत नाही पण निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये सरकारची स्वच्छ व विकास केल्याची प्रतिमा मीडियातून दाखवण्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्यामार्फत मीडियाच्या प्रमुख व्यक्तींना बोलावून टार्गेट दिले जात आहे. यासाठी एमएसआरडीसी, एमएमआरडीए, म्हाडा, सीडको, प्रदुषण महामंडळ, एसआरए यांचा पैसा वापरला जात आहे. राज्य सरकारच्या विविध महामंडळावर हजारो कोटींचे कर्ज आहे. महामंडळे ५० हजार कोटी रुपये तोट्यात आहेत हे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. सरकारकडे पैसे नसताना या महामंडळाचा पैसा वापरून कोट्यवधींची उधळपट्टी सुरु आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

पावसामुळे राज्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून ७३ टक्के ओला भागात दुष्काळ आहे. गेल्या तीन चार दिवसांत ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. शेतकरी संकटात आहे पण सरकारने अद्याप मदत दिलेली नाही. मुंबईतील नालेसफाईच्या कामात जातीने लक्ष घातल्याने मुंबई तुंबणार नाही असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एका कार्यक्रमात केला आणि संध्याकाळी झालेल्या पावसात मुंबई तुंबली, मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. अवकाळी पावसासारखे भाजपा युती सरकारही अवकाळीच आहे, असेही पटोले म्हणाले.

खाजगी जागेतील मतदान केंद्र रद्द करा..


यावेळी बोलताना काँग्रेस सरचिटणीस मुनाफ हकीम म्हणाले की, रश्मी शुक्ला यांची कालमर्यादा संपली असतानाही सरकारने त्यांना कालमर्यादा वाढवून दिली आहे. पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सरकार दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे. कालमर्यादा संपलेल्या पोलीस महासंचालक यांना पदावरून हटवावे, तसेच राज्यातील अनेक विभागात शिपाई ते अधिकारी हे ३ वर्षांपासून त्याच जागी काम करत आहेत, ते बदलले पाहिजेत अन्यथा त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो अशी भूमिका निवडणूक आयोगाकडे मांडली. त्यावर अशा प्रकारचे वादग्रस्त अधिकारी निवडणूक काळात राहणार नाहीत, असे आश्वासन देण्यात आले आहे.
खासगी सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र सुरु करण्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून मतदान हे सरकारी इमारतीतच झाले पाहिजेत. तसेच मतदानाची आकडेवारी देणारे 17 C फॉर्म मतदानानंतर लगेचच मतदान प्रतिनिधींना देण्यात यावेत अशी भूमिकाही यावेळी मांडल्याचे मुनाफ हकीम यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, डॉ. गजानन देसाई, काकासाहेब कुलकर्णी, मदन जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button