भारतमहाराष्ट्रमुंबई

वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असतानाही भाजपा सरकारकडून जबरदस्तीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न: नाना पटोले

विधान परिषदेच्या चारही मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा. कोकण पदवीधर मतदारसंघातील मविआचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पालघरमध्ये मेळावा संपन्न.

पालघर, दि. १९ जून: पालघर जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध असतानाही भाजपाच्या तानाशाही सरकारने गुजरातच्या भल्यासाठी बंदर बांधण्याचा चंगच बांधला आहे. पालघर जिल्हा निसर्ग संपन्न असून मच्छिमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. वाढवण बंदरामुळे पर्यावरणाची हानी तर मोठ्या प्रमाणावर होणारच आहे पण मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येऊन लाखो लोकांच्या रोजगारावर गदा येणार आहे. स्थानिकांचा विरोध डावलून भाजपा सरकार जबरदस्तीने वाढवण बंदर बांधून स्थानिकांना देशोधडीला लावत आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातील मविआचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पालघरमधील कार्यकर्ता व पदवीधर मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकारने २०१४ पासून राज्यात नोकर भरती केली नाही. नोकर भरती केली तर पेपरफुटी होते आणि परिक्षा रद्द मग पुन्हा परीक्षा आणि त्यासाठी पुन्हा फी भरा असे दुष्टचक्र सुरु आहे. पोलीस भरती पावसाळ्यात घेतली जात आहे, या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी जोर धरत आहे पण भाजपा सरकार ऐकत नाही. पदवीधर असूनही नोकरी नसल्याने मोलमजुरी करण्याची वेळ पदवीधरांवर आली आहे. वेळेवर परीक्षा घेतल्या जात नसल्याने वयोमर्यादा संपते व तरुणांचे स्वप्न भंगते. राज्यातील सुशिक्षित मतदार हा भाजपाच्या तानाशाही सरकारच्या विरोधात आहे हे दाखवण्याची ही संधी आहे.

पदवीधर निवडणुकीत सुशिक्षित लोक मतदान करत असतात. आजपर्यंत भाजपा अशा मतदारसंघावर कब्जा करत असत. पण आता चित्र बदलले आहे, नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार निवडून येत होता पण महाविकास आघाडीने ती जागा लढवली व जिंकली. त्यानंतर अमरावतीची जागाही जिंकली. आता विधान परिषदेच्या चार मतदारसंघात निवडणुकीत होत असून या चारही निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, राहुल गांधी यांची पदयात्रा काढून देशातील चित्र बदलवले त्यामुळे काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले, राज्यातही महाविकास आघाडीला घवघवशीत यश मिळाले. मागील तीन वर्षात झालेल्या विधान परिषद निवडणुका, पुण्यातील कसब्याची पोटनिवडणुक व आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सातत्याने यश मिळाले त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही मोठे योगदान आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातूनही मविआचे उमेदवार रमेश कीर यांनी बहुमताने विजयी करा असे आवाहन नसीम खान यांनी केले.

या मेळाव्याला प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, कोकण पदवीधर मतदारसंघाचे मविआचे उमेदवार रमेश कीर, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह, पालघर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राकेश पाटील, विकास गोरे यांच्यासह महाविकास आघाडीतल सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button